Tuesday, July 26, 2011

शब्द जैसे कल्लोळ... !


    'शब्द बापुडे पोकळ वारा' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना, तेव्हा हे चार शब्द तेवढे आठवत राहतात. एरवी झराझरा कागदावर सांडू पाहणारे आणि लिहिण्याचीही उसंत न देणारे शब्द जेव्हा असा असहकार पुकारतात तेव्हा मात्र खूप खूप राग येतो त्यांचा... कोणीतरी चक्क दगा देतंय आपल्याला असं वाटायला लागतं. आपण मारे मोठ्या आवेशात लिहायला बसतो. आता एवढं लिहून काढायचंच असं म्हणायला जातो आणि गाडीला ब्रेक लागावा तसं काहीसं होतं. एकदम सगळं स्टॉप...

   मग तुम्ही काय वाट्टेल ते करा... आरडाओरडा( म्हणजे मनातल्या मनात. नाहीतर शब्द सुचत नाहीत म्हणून ओरडणार्या माणसांना आपल्याकडे वेडं समजण्याची शक्यता असते म्हणून :P), कागद फाडा, शब्दांच्या नावाने शिव्या घाला (पण त्यासाठी पण शब्द लागतील नाही का...) थोडक्यात काय, तर आपण मनातल्या मनात चरफडल्याशिवाय काहीही करू शकत नाही. त्यांना यायचं तेव्हाच ते येणार, सुचणार... मग ती त्यांची मर्जी... कधी, कुठे, कसं सुचायचं ते... कधी ते एखाद्या समेच्या टिकाणी असे अचूक सुचतात की वाटावं, 'व्वा...क्या बात है.' जणू काही ते आपल्याच अंकित असल्यासारखे वाटावेत इतके जवळ येतात. तर कधी इतके फटकून वागतात की आपण त्यांना किती परके आहोत. कधी नको त्या ठिकाणी आठवून आपली अगदी गोची करतात... त्यांचं काही नक्की नसतं. माणूस बेसावध असताना, आपल्याला हवं तेव्हा शब्द साथीला येतील अशा खोट्या भ्रमात असतानाच ते नेमके गुंगारा देऊन पळून जातात... आपल्याला हतबल करुन...

   कदाचित... कदाचित त्यांच्या या अशा अडनाडी वागण्यातून त्यांना काही सुचवायचं तर नसेल आपल्याला...? प्रतिभा म्हणा किंवा अचूक शब्दसंधान... आपल्याला ते साध्य झालं तरी आपण त्यावर हुकमत गाजवू शकत नाही. मी शब्दांना गुलाम करुन हवं तसं वापरेन असं म्हणणार्यांच्या तर ते जवळपासही फिरकत नाहीत. कितीतरी 'मी मी 'म्हणणारे इथे तोंडघशी पडतात. शब्दांचीही आराधना, साधना करावी लागते. संगीतात जसा रियाझ लागतो तसा शब्हांचाही रियाझ करावा लागतो. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंत तर ते चक्क रुसून बसतात, हुलकावण्या देतात. त्यांच्याशी मैत्रीच करावी लागते.... तरच ते 'शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे' अशी अनुभूती देतात...  

Monday, June 20, 2011

एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...


    कुठलंही छोटं युद्ध असो वा महायुद्ध... त्याचे परिणाम हे सरतेशेवटी विध्वंसकच असतात. जीवितहानी होते ती होतेच. पण मनस्थितीची, लोकांच्या भावविश्वाची मोडतोड होऊन जिवंतपणीही मरणयातना भोगायला लागाव्यात इतके हे युद्धाचे-महायुद्धाचे परिणाम भीषण असतात. दुसरं महायुद्ध... हेही अवघ्या जगासाठी असंच उध्वस्त करणारं ठरलं. आपण त्या काळात नव्हतो तरी त्यावेळच्या गोष्टी ऐकूनही आपल्या अंगावर काटा येईल. 'हे सगळं असं का?' असा अनुत्तरित प्रश्न तेव्हाच्या जनतेला पडावा आणि त्यावर विचारही करता येऊ नये इतकं डोकं सुन्न व्हावं अशी परिस्थिती तेव्हा होती. असाच काहीसा प्रश्न नऊ वर्षांच्या, जर्मनीच्या राजधानीत, बर्लिनमध्ये राहणार्या छोट्या ब्रूनोलाही पडतो. तिथूनच, ' द बॉय इन द स्ट्राइप्ड पायजमाज्' या जॉन बायेन यांनी लिहिलेल्या आणि मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाची सुरूवात होते.

     शाळेतून घरी आल्यावर अचानक आपल्या घरातल्या सामानाची आवराआवर चाललेली पाहून ब्रूनोला पडणारे प्रश्न, आपलं बर्लिनमधलं सुखवस्तू आणि (ब्रूनोच्या मते) भरपूर संशोधन करता येईल असं घर सोडून जाताना अचानक स्थलांतर कराव्या लागणार्या लोकांना काय वाटत असेल याची कल्पना येते. लहानग्या निरागस ब्रूनोसाठी तर हे सगळं गोंधळात टाकणारंच असतं. नव्या घरच्या कोंदट वातावरणात ब्रूनो अगदी उबून जातो. पण... पण एक दिवस घराच्या खिडकीतून कुंपणापलीकडे त्याला विचित्र दिसणार्या, कैद्यांसारखे एकसारखे कपडे घातलेल्या, खाली मान घालून चाललेल्या लोकांचा घोळका दिसतो आणि ब्रूनोच्या इवल्याशा डोक्यात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उमटतात. त्याचं कुतूहल चाळवतं. मग सुरू होते एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...

    ही धडपड करत असतानाच एकाकी ब्रूनोला भेटणारा, कुंपणापलीकडच्या 'त्या' लोकांमध्ये राहणार्या, त्याच्याच वयाचा श्म्यूल, त्या दोघांची जमलेली गट्टी यांतून गोष्ट पुढे सरकत राहते. या सगळ्यांत एक दिवस मात्र वेगळाच उगवतो... श्म्यूलचे हरवलेले बाबा शोधण्यासाठी ब्रूनो मित्राने दिलेले रेघारेघांचे कैद्यांचे कपडे घालून कुंपणाच्या अगदी छोट्याशा फटीतून पलीकडे पाऊल टाकतो मात्र... त्यानंतर पुढे ब्रूनोचं काय होतं हे कळून घेण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.

    संपूर्ण पुस्तकात, अधूनमधून होणारा हिटलरच्या उल्लेखामुळे महायुद्धाचा विषय आणखीनच गडद होऊन मनावर ठसतो. तसेच, पुस्तक वाचताना लेखकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून ब्रूनोच्या भावविश्वात होणारी उलथापालथ चित्रित केलेली जाणवते. ‘‘ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे ; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला ना कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्याने ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेने वाटलं.’’ या वाक्यांतूनच आपल्याला ब्रूनोच्या मनस्थितीची कल्पना येते. पण ब्रूनोची ही मनस्थिती फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित नाही. तर ही महायुद्धाचे परिणाम विनाकारण भोगणार्या प्रत्येक माणसाच्या मनोवस्थेचं प्रतिनिधित्व करते. आणि पुस्तक वाचून संपल्यावर 'हे सगळं असं का?' हा लहानग्या ब्रूनोला पडलेला आणि कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न आपल्यालाही छळत राहतो...
                                              

Wednesday, May 11, 2011

गर्भस्थ...!!


    
     नुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असलेलं ते बाळ... खूप हेवा वाटला त्याचा...
    
     आपल्यालाही असं पुन्हा गर्भस्थ होता आलं तर... किती बरं होईल... पळपुटेपणा म्हणून नाही, पण खरंच कधीकधी असं व्हावंसं वाटतं खरं... म्हणजे त्या इवल्या बाळापर्यंत येणारे सगळे आघात आई कशी थोपवते, तसं आपलंही कोणीतरी असावं असं फार फार वाटतं...
    
     कशी एकदम अनटच्ड् आणि अनप्लग्ड् असतात ही बाळं. जगातल्या कसल्याही भावनेचा अजूनपर्यंत स्पर्श न झालेली... तिथे असते ती केवळ शुद्ध निरागसता... बाकी कसल्याही भावनांचा लेप नसलेली... निर्लेप!
     
     अज्ञानात सुख असतं असं म्हणतात. लहान बाळही अजाणच असतं की... आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीबद्दल... म्हणूनच का ती इतकी निरागस असतात? फारच बालिश प्रश्न वाटतोय का? पण बघा ना तुम्हीही विचार करून... नाही वाटत तुम्हाला असं कधी की कोणीतरी येऊन मायेने लहान बाळासारखं थोपटावं आणि आपण मुटकुळं करून पडून राहावं... बाकी सगळ्या जगाचा विसर पडावा आणि आपण आपल्याच निरागसतेच्या कोशात लपेटून घ्यावं स्वतःला...
     
     जगातला पहिला श्वास घेताना आणि त्यानंतर संपूर्ण जगाला सामोरं जाताना जी झुंज द्यावी लागते त्याचं बळ या अशा गर्भस्थ अवस्थेतूनच मिळत असतं बहुतेक... म्हणूनच एकदा तरी जाणतेपणाने अनुभवावी... अशी गर्भस्थ अवस्था...!!

Monday, May 9, 2011

लहानपणी जाणवलेली आई....


    तीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे कळण्याचं ते वय नव्हतं... ती थोडा काळ जरी नसली तरी आपलं काय होईल याचा विचारही कधी केला नव्हता... पण तरी शाळेतल्या अजाण वयातही तिच्यावरच्या प्रेमापोटी केलेली ही अल्लड, बालिश कविता...मातृदिनाच्या निमित्ताने...!!!



आई ही आई असते
ती खरी किंवा खोटी नसते

चिमण्या पिल्लाला सांभाळायला
ती सदैव दक्ष असते

आई म्हणजे समईतली ज्योत
 अखंड प्रेमाचा झोत
 अडलेल्याचा हात
 तर एकाकीपणाची साथ

आई असते आभाळ
जन्मदात्री धरती
तोच सुखी होईल
ज्याला कळेल तिची महती

आ म्हणजे आत्मा
 ई म्हणजे ईश्वर
सप्तसुरांच्या लयीतला हा एकच अनोखा स्वर
जो कधीही लोप पावत नाही,
सतत कानात किणकिणत राहतो,
           देवळातल्या घंटेसारखा....!


 तिचं अस्तित्व सतत जाणवत राहतं

 सुगंध सतत दरवळत राहतो
 नुकत्याच उमललेल्या,
           मोगर्याच्या फुलासारखा....!
                                                        
                     

Thursday, May 5, 2011

तेल नावाचा इतिहास...


     साधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. तिकडे अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया राज्यात दगडांमधल्या भेगांमधून एक प्रकारचा तेलकट, चिकट आणि उग्र वासाचा द्रव निघतो काय आणि पेटती काडी त्या द्रवात बुडल्यावर न विझता जळत राहते काय.... सारं काही अजबच... पण हाच 'पेट्रोलियम' नावाचा अजब-गजब पदार्थ आजही अख्खं जग चालवतोय. एवढंच नाही तर जगातलं राजकारण बदलण्याची, उलथंपालथं करण्याची ताकद या पदार्थात आहे. अशा या सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणार्या ज्वालाग्राही पदार्थाची गिरीश कुबेर यांच्यासारख्या चतुरस्त्र पत्रकाराने लिहिलेली रंगतदार कथा ''हा तेल नावाचा इतिहास आहे!...'' या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
    
      त्या काळात हे असं दगडांमधून तेल झिरपायला लागल्यावर ते खणून काढण्याचा सपाटा सुरू झाला आणि जगातल्या तेलपर्वाची सुरूवात झाली. ती कशी झाली, तेलाची पहिली जगप्रसिद्ध 'स्टॅण्डर्ड ऑईल' कंपनी आणि त्यातून मग निरनिराळ्या कंपन्या कशा निर्माण झाल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात सापडतात. तसंच, सौदी अरेबिया, इराक, इराण यांसारख्या तेलाचा मुबलक साठा असलेल्या अरबी देशांचा या तेलकारणातला सहभाग याविषयी हे पुस्तक भाष्य करतं. एवढंच नाही तर त्या काळापासून ते आजतागायत या तेलाच्या साठ्यावरच सगळ्या देशांचं राजकारण चालत आलंय. कोणाकडे किती तेलसाठे आहेत आणि कुठल्या देशाच्या कंपनीला सर्वांत जास्त तेलाचा व्यापार करण्याची संधी मिळते या गोष्टींभोवतीच आजचा जगाचा कारभार फिरतोय. आपल्याला कल्पनाही आली नव्हती आणि येणार नाही इतकं या तेलाचं महत्त्व आज जगभर आहे. इतकं की 'वसुंधरेचं रक्त' असा या तेलाचा उल्लेख केला जातो. जगाचा भूगोल या तेलाने बदलला, इतिहास घडवला. तो इतिहास रक्तरंजित आहे, युद्धमय आहे, राजकीय आहे आणि लष्करीही... कारण वरवर पाहता पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाची कारणं वेगळी असली तरी त्या सगळ्याच्या मुळाशी हे तेलच होतं. या तेलाचं संरक्षण करता यावं आणि ते तेलसाठे इतर देशांच्या हाती लागू नयेत म्हणून जे डावपेच आखले गेले या सगळ्याचा इतिहास केवळ अफलातून आहे.
    
      मुख्य म्हणजे हा सगळा इतिहास लेखकाने रोचक आणि रंजक करून सांगितला आहे. त्यामुळे हे पुस्तक तेलखपाच्या आकडेवारींनी आणि तेलभावाच्या कोटीमध्ये असलेल्या आकड्यांनी भरलेलं असलं तरी कुठेही कंटाळवाणं होत नाही. याऊलट, फक्त तेलाविषयीच नव्हे तर आपल्याला माहित नसलेल्या इतरही अनेक इंटरेस्टिंग गोष्टी हे पुस्तक आपल्याला सांगून जातं. उदाहरणार्थ, जगातल्या पहिल्या मोठ्या तेलकंपनीचे जनक असलेल्या रॉकफेलर यांची त्या काळची संपत्ती ही आजच्या जगात सर्वांत श्रीमंत ठरलेल्या बिल गेटस् च्या दुप्पट होती. तेही १९१० साली..., तर नोबेल पारितोषिकाची परंपरा कशी सुरू झाली याचा किस्साही वाचावा असाच आहे. नोबेल पारितोषिकाचा उद्गाता असलेल्या आल्फ्रेड नोबेलला अजून दोन भाऊ होते. त्यातल्या लुडविग या तेलव्यापारात काम करणार्या एका भावाचं निधन झालं. त्यावेळी, वृत्तपत्रांनी चुकून आल्फ्रेड नोबेल गेल्याचं छापलं आणि त्याच्यावर मृत्युलेख लिहिताना त्याच्या संशोधनावर टीकेची झोड उठविली. त्यावेळी मनाच्या उद्विग्न अवस्थेत आल्फ्रेड नोबेलने आपलं मृत्युपत्र पुन्हा नव्याने बदललं आणि,’’ माझ्या संपत्तीचा उपयोग विज्ञानक्षेत्रात भरीव कामगिरी करणार्यांच्या गौरवासाठी करा’’ असं लिहून ठेवलं. तेव्हापासून जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिकाची सुरूवात झाली.
     
     तसंच, दुसर्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेची लुसिटानिया ही आलिशान प्रवासी बोट जर्मनीच्या यू-बोट म्हणून ओळखल्या जाणार्या पाणबुड्यांनी बुडविली. या पाणबुड्यांनी अनेक तेलवाहू जहाजं बुडविली होती. त्यामुळे, सगळ्याच देशांना या जर्मन पाणबुड्यांची दहशत बसली होती. हा सगळा इतिहास हे पुस्तक आपल्यासमोर जिवंत करतं. तर पर्ल हार्बरवरचा चित्तथरारक हल्ला आपल्याला ऐकून माहित आहे. तो हल्ला, त्याच्यापूर्वीची आणि त्यानंतरची परिस्थिती याचं वर्णन अशा आपल्याला माहित नसलेल्या कितीतरी गोष्टी आणि त्याचबरोबर, आपल्या ‘’मुंबई हाय’’च्या आणि ओएनजीसीच्या जन्माची कथाही यांत वाचायला मिळते.  
      
     अशा या बहुरूपी, बहुगुणी तेलाला फार मोठा विस्तृत इतिहास आहे आणि तितकंच महत्त्वही आहे. ते महत्त्व किती आणि कसं, हेच तेल जगातल्या पटावरची प्यादी कशी हलवतं आणि शेअरबाजारापासून ते निरनिराळ्या करारांपर्यंत सगळ्या गोष्टी काबीज कशा करतं हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

Sunday, April 10, 2011

'एक छांदिष्ट अवलिया'


     शाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. 'माझा आवडता छंद'... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लिहून मोकळे व्हायचे. काही मोजकीच मंडळी अशी असायची की जी आपल्या हटके छंदांबद्दल लिहायची. आज मीही अशाच एका 'छांदिष्ट अवलियाची गोष्ट' सांगणार आहे. त्यांचे छंद विचाराल तर एक काय आहेत? त्यावर एक अख्खं पुस्तक लिहून झालंय त्यांचं...'छंदांविषयी' नावाचं... तरीही अजून त्यांचे छंद त्या पुस्तकात मावणार नाहीत इतके अचाट आहेत. पण त्यांच्या या पुस्तकातून आपल्याला त्यांच्या एक सो एक भन्नाट छंदांची कल्पना येते एवढं मात्र नक्की... आणि म्हणूनच 'मुक्तांगण' सारख्या समाजोपयोगी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक असणारे डॉ. अनिल अवचट हे आपल्याला त्यांच्या 'छंदांविषयी' या पुस्तकातून 'तो छांदिष्ट अवलिया' म्हणूनही तितकेच भावतात.
    
   खरं तर या पुस्तकाबद्दल एका वाक्यात सांगता येणं तसं कठीणच आहे. पण त्यांना असणार्या निरनिराळ्या छंदांविषयी, एखादा छंद कसा जोपासला गेला आणि त्यातून जोडली गेलेली माणसं या सार्या गोष्टींविषयीचं त्यांचं दिलखुलास मनोगत म्हणजे हे पुस्तक. पुस्तकामध्ये चित्रकला, स्वयंपाक, ओरिगामी, फोटोग्राफी, लाकडातील शिल्पकाम, बासरीचा नाद, वाचनवेड अशा सात छंदांविषयी त्यांनी विस्तृत लिहिलं आहे. तर बाकीच्या छंदांविषयीही त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे. एकाच व्यक्तीला एवढे सगळे छंद असू शकतात आणि ती व्यक्ती त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुशल असू शकते हे वाचूनच आपण थक्क होतो.
   
   एवढंच नाही तर, आपल्याला भेटणार्या प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कलागुण असतातच. ते हेरून त्या व्यक्तीकडून ते कलागुण शिकण्याच्या प्रत्येक पायरीवर मिळणारा निर्भेळ आनंद, त्यामुळे जोडली गेलेली असंख्य माणसं... हे सगळं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. त्यातल्या प्रत्येक छंदाचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य त्यांचं पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं आणि मग छंदांच्या एका निराळ्याच दुनियेत आपण प्रवेश करतो.
   
    अनिल अवचटांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, डोक्यात काहीतरी छंद असलेल्या माणसाचं मन काही वेगळंच असतं. त्याला वाटतं जे करावं, तेच तो करत राहतो. अशा एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो. तो शिकण्याचा काळ मला फार रम्य वाटतो. अशा शब्दात अनिल अवचट आपली छंदांविषयीची भूमिका स्पष्ट करताना दिसतात.
    
    मोर, झाडे, डोंगर अशा एकेका विषयावर दोन दोन महिने मनमुक्तपणे चित्र काढणारे, निरनिराळे खाद्यपदार्थ स्वतः शिकून घेऊन ते हौशीने सगळ्यांना खाऊ घालणारे, हातातल्या कागदांशी खेळता खेळता, ओरिगामीद्वारे बघता बघता लीलया पक्षी- प्राणी तयार करणारे अनिल अवचट आपल्याला इथे भेटतात. फोटोग्राफी करताना माणसांच्या चेहर्यावरचे नैसर्गिक भाव टिपणं त्यांना आवडंतं. तर लाकूड, प्लास्टर ऑफ पॅरिस यामधून शिल्पं कोरून काढण्यातली मजाही ते या पुस्तकात उलगडून दाखवतात. त्यांचा बासरीचा नादही औरच... अगदी दीड वीत लांबीच्या छोट्या बासर्यांपासून ते अडीच-तील फुटी बासर्यांपर्यंत अनेक सुरेल बासर्या त्यांच्याजवळ आहेत. त्या बासरीच्या छंदांबद्दल वाचताना आपल्यालाही तो छंद जोपासावा अशी उर्मी आल्यावाचून राहात नाही. या छंदांशिवाय कोडी उलगडण्यापासून ते जादूचे प्रयोग करण्यापर्यंत असे कितीतरी छंद त्यांना आहेत ते वेगळेच आणि ती यादी न संपणारी आहे...
    
     आपल्या आयुष्यात छंद किती आनंद निर्माण करू शकतात याची जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचताना होते. म्हणूनच, आवर्जून वाचावं असं हे पुस्तक, छंदांविषयी...!
                                                                                                                                  

Saturday, April 9, 2011

झपूर्झा...


 
     जेव्हा काहीच सुचत नाहीसं होतं....
आणि खोल, आत कुठेतरी काहीतरी चालू असतं....
    तेव्हाच निर्मितीचे क्षण जवळ आलेले असतात....
कारण, आत काहीतरी उमलू पाहात असतं....

प्रत्येक वेळी ते शब्दबद्ध नाही करता येत
  काहीवेळा निसटून जातं....
मुठीत धरलेल्या वाळूसारखं...

पण कधी कधी...
रात्रीच्या गर्भातून एकदम प्रकाश फुटावा
तसं काहीसं होतं....
एरवी ओंजळीत न सापडणारे शब्द
झराझरा कागदावर सांगत राहतात....
मनसोक्तपणे....

एका विलक्षण धुंदीत शब्द उमलत राहतात....
   प्रतिभेची तार झंकारली जाते....
आणि 'तंद्री' ते 'झपूर्झा' असा,
   अज्ञाताचा प्रवास चालू होतो....
निःशब्दपणे...
पण तितक्याच उत्कटपणे...!!
                       - रश्मी.

Wednesday, April 6, 2011

कलंदर


      बाकीच्यांचं माहीत नाही...पण माझ्यामते उत्कट जगणं हीसुद्धा एक कला आहे, खुबी आहे. काही माणसं अशी मुळातूनच भरभरून जगतात की त्यांचं जीवनचरित्र वाचणं किंवा त्यांना प्रत्यक्ष जगताना बघणं ही एक आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक क्षण सघन जगणं यांना कसं काय जमतं बुवा...


त्यातली काही असतात कलंदर...
जीवन स्वच्छंदी जगण्यासाठीच आहे असं मानणारे...उन्मुक्त फुलपाखरासारखे...!
काही असतात, जीवनालाच आव्हान देणारे... वाईट गोष्टींचा विचारही नाही... फक्त आला काळ मनस्वीपणे जगायचं माहित...
     
अशी माणसंच संजीवनी देऊन जातात... सहवासात येणार्या 
प्रत्येकाला आशेचा एक किरण दाखवून...
 कितीही संकटं आली तरी यांची प्रसन्नता लोप पावत नाही.                                                              

जबरदस्त इच्छाशक्ती आणि विजिगिषू वृत्तीच यांना तारते.
आश्चर्याने थक्क होऊन थकायची वेळ येते...
आनंदाची छोटी छोटी बीजंच पेरतात बहुतेक ती...
आपली छोटी-मोठी दुःखं आत ठेवून चेहर्यावर निर्व्याज हसू कसं काय आणतात? हा एक मोठ्ठा प्रश्न आहे मला पडलेला...!
पण ते हसू जादुई असतं खरं...
कारण...? कारण...
त्यांचा जीवनाबद्दल एक निश्चित विचार असतो. मिळालेल्या आयुष्यावर नितांत प्रेम करतच जगत असतात अशी माणसं... अवघ्या सृष्टीतल्या मांगल्याविषयीचा त्यांचा विश्वास दृढ असतो....आणि...
त्यांनाच आयुष्याचं खरं मोल कळलेलं असतं...
                                    - रश्मी.

Tuesday, March 29, 2011

'लंपनची गोष्ट'


वनवास- प्र.ना.संत
    काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसारखीच सामान्य वाटणारी ही मुलं आतून खरंच खूप अंतर्मुखही असतात. एवढ्या लहान वयातही प्रत्येक गोष्टीवर आपले विचार व्यक्त करण्याची क्षमता त्यांच्यात असते, भले मग ते विचार बाकीच्यांना बालिश वाटू देत... आणि त्यामुळेच ती वेगळी ठरतात. प्रकाश नारायण संत (प्र.ना.संत) यांच्या 'वनवास' या पुस्तकातून आपल्याला भेटणारा लंपन (कोणासाठी लंप्या तर कधी लंपू) पण असाच आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या एका छोट्याशा गावात आपल्या आज्जी-आजोबांबरोबर राहणारा हा शाळकरी मुलगा जितका तरल...तितकाच तीव्र संवेदनाशील...
त्याचं मन एवढं 'टिपकागदी' आहे की त्याला छोट्या छोट्या गोष्टीतही काहीतरी वेगळं सापडतंच. म्हणजे आता उन्हाचा पिटुकला कवडसा...पण तोही त्याला सूर्याचा हात वाटायला लागतो. आजूबाजूच्या प्रत्येक इटुक-पिटुक गोष्टींचं खास त्याच्या अशा 'बेष्ट' स्टाईलमधे वर्णन करणं हे लंप्याचं कामच मुळी...!  त्याची हीच खास स्टाईल आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
   अगदी त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ‘’आमचं म्हणजे सगळं एकदम मॅडसारखंच...  म्हणजे आंम्हाला नेहमी मॅडसारखं काहीतरी वाटतं. बेष्टपैकी काहीतरी आवडतं. आम्ही आपले सारखे आजोबांना, बाबांना एकशेसत्तावीस  का काय वेळा ते प्रश्न विचारत राहतो. आंम्हाला दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपायचं असंतं... पण झोपच येत नाई. वाईट वाटलं, रडायला आलं की आमचा घसाच दुखायला लागतो.’’ अशा लहान-सहान गोष्टी सांगून तो पुस्तकातून आपली ओळख पटवत राहतो.
सुमी म्हणजे त्याची पेट्ट मैत्रीण. त्याच्या बोलण्याची ढब पण भन्नाटच. पाहुणे आले की 'कोण की' आलेत म्हणून स्वारी मोकळी होते. '' असं काहीतरी झालं की आमचं जे काही होतं, ते होतं.'' असं म्हणून तो आपली होणारी पंचाईत पण तो सांगून टाकतो.
      त्याचे प्रत्येक गोष्टीवरचे विचार म्हणजे अफलातूनच... '' चॉकलेटच्या रंगीत वड्या कागदात गुंडाळलेल्या असतात. तशी ही मॅड पोरं कोणत्यातरी वासामध्ये गुंडाळलेली.'' असं आपल्या शाळेतल्या मुलांविषयी त्याला वाटतं. तर शाळेत असताना '' तेवढ्याच भागातल्या त्या उन्हात उभी असलेली पोरं आणि पोरी सोन्याचा वर्ख लावलेली दिसत होती. त्यांच्या अंगावरून नुसतं बोट फिरवलं तरी त्याला तो सोनेरी रंग लागेल असं काहीतरी मला मॅडसारखं वाटायला लागलं.'' असंही तो म्हणतो. यांतूनच आपल्याला त्याची तरल संवेदना आणि अचाट, भन्नाट कल्पनाशक्ती कळते.
     सुमीची आणि त्याची दोस्ती एकदम जगावेगळीच.. त्यांच्यातली घट्ट पण खट्याळ मैत्री..., मधूनच सुमीच्या डोळ्यात त्याला जाणवणारी, दिसणारी रंगीत पिसं, सुमी आजूबाजूला असल्यावर आणि नसल्यावरही त्याला तिच्याबद्दल जाणवणारी अस्पष्टशी गोड, अनामिक हुरहुर हे सगळं...सगळं लंपनच्याच शब्दांत वाचताना आपण आपल्याही नकळत त्याच्या विश्वात गुंतत जातो.
     लंपूच्या आजूबाजूची, वंटमुरीकर देसायांचा लठ्ठ बोका, तांबुळवाडकर आजी, एशी, केबी, चंब्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या अशी अतरंगी नावं असलेले त्याचे मित्र ही मंडळीही गोष्टीत मस्त रंगत आणतात. मग आपल्यालाही त्या गोष्टीत असल्यासारखं वाटायला लागतं... त्याच्या घरासमोरून जाणारा 'गुंडीमठ' रोडही खरं तर त्याचा मित्र. '' त्याला पण आपल्यासारखंच एकटं वाटत असणार, नक्की.'' असं तो म्हणताना आपल्याला त्याच्या सजग संवेदना जाणवत राहतात. पुस्तकातल्या त्याच्या निरागस आणि भाबड्या विनोदांवरही आपण तितक्याच मोकळेपणाने हसतो.
     प्र.ना.संत यांनी मोकळ्या-ढाकळ्या, अनौपचारिक शैलीत रंगवलेला हा 'लंपन' म्हणूनच आपल्याला जास्त जवळचा वाटायला लागतो. पुस्तकातल्या गोष्टी अगदी साध्या-सोप्या आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यात घडणार्या आहेत. पण त्या लंपनच्या शब्दात ऐकताना मात्र त्या गोष्टींमधली खरी गंमत, आनंद कळत जातो. त्यामुळे लंपनच्या वयाच्या अशा संवेदनाशील मुलांचे भन्नाट विचार, त्यांना वाटणार्या अबोल भावना नक्की कशा असतात ? त्यांचा अल्लडपणा, हुडपणा, निरागसता, तरलता हे सारं अनुभवण्यासाठी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचायला हवं.
     'वनवास' प्रमाणेच 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत' या पुस्तकांतूनही लंपनची गोष्ट चालूच राहते. मात्र त्याच्या जाणीवा-नेणीवा वयाबरोबर बदलत जातात आणि त्याबरोबर एका भावनाशील लंपनची ओळख नव्याने पटत जाते.
     म्हणूनच, पुस्तक वाचून संपलं तरी हा छोटुला, निरागस लंपन मनात कायमचा घर करून राहतो...  

Sunday, February 6, 2011

परकं


कधीकधी सगळंच परकं होतं...
 आई-बाबा, मित्रमंडळी, आजूबाजूचे ,
 एवढंच काय तर,
 आपणही आपल्याला परके वाटायला लागतो.

बाकीच्यांच्या वागण्याचं सोडूनच द्या...
इथे आपल्याच वागण्याची नाही शाश्वती
मग हे असं का ? अशा कधीही उत्तर न सापडणार्या
प्रश्नात खोल खोल रुतणं...

आपलंच बोलणं आणि आपलंच वागणं...
परक्याहून परकं...
बाकीच्यांच्या वागण्याचं मग कशाला कोडं ?

पण... पण परकं होण्याची सवयही परकी झाली तर...
खरंच सगळं आपलंसं वाटायला लागेल ?
पण आत्ता उत्तर नाही मिळणार याचं...
कारण तेही परकं झालंय सध्या...

Friday, January 28, 2011

अश्रू


  मन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय, बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते, आकाशात काळे ढग दाटावेत तसा आवंढा दाटून येतो आणि डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागतात... अगदी विमुक्तपणे...! त्या वेळच्या क्षणाला नाव नसंतं. पण तो अनामिक क्षण आपल्या मनात कायमचा घर करुन बसतो. मनातला सगळा भर हलका करणार्या त्या वेळच्या त्या अश्रूंना काय उपमा द्यायची हे कळत नाही. पण त्या विशिष्ट क्षणापुरता तरी तो आपल्या अस्वस्थतेवरचा उतारा असतो आणि आपण अगदी अतीव एकटे असू तेव्हाचा सोबतीही...
   '' आमच्या डोळ्यात आत्तापर्यंत पाण्याचा एक टिपूस नाही आलेला. अजूनही येत नाही आणि कधी येणारही नाही.'' असं म्हणणारं कोणी भेटलं की खरंच आश्चर्य वाटतं. मागून राहून राहून एकच शंका मनात डोकावत राहते; ही माणसं मनातल्या मनात तरी कधी रडत असतील का? '' आपल्याकडे रडणं किंवा डोळ्यात पाणी येणं हे सहसा कमकुवत असल्याचं लक्षण मानलं जातं. (पुरुषांच्या बाबतीत तर फारच) पण '' अश्रू '' हे संवेदनांचं उत्तम लक्षण आहे. हो, अगदी वैद्यकीय परिभाषेतसुद्धा... मग ते व्यक्त करताना कमीपणा कसला ?
   ते कढत पाणी गालावरून ओघळायला लागल्यावर आत कुठेतरी हळूहळू घट्ट बांधले गेलेले आपण मोकळे व्हायला लागतो. त्यांच्या तुरट-खारट चवीमागचं कारण काही कळत नाही. पण मनातलं टोचणारं काहीतरी त्याच्याबरोबर वाहून जातंय असं मात्र वाटत राहतं. लहानपणी आई कुठे दिसत नाही म्हणून घाबरून डोळ्यात येणारं पाणी, मोठं होत जाऊ तसं कधीकधी वाटणार्या असुरक्षिततेमुळे डोळ्यात तरारलेलं पाणी, कधी नकळत हळूच डोळ्याच्या काठाशी डोकावणारं पाणी यांतल्या प्रत्येकाला वेगळा अर्थ आहे. त्यांच्यात साम्य असलंच तर हे की हे सगळे सच्चे अश्रू असतात... एकदम सच्चे...! कधी आनंदाने चिंब भिजल्याने येणारे, कधी अनावर दुःखाने येणारे तर कधीकधी असंच मन कातर झाल्याने येणारे...
   सो, जगातलं आपलं बाकी काहीही हरवलं तरी चालेल एक वेळ... पण ‘’ अश्रू ‘’ हरवू देऊ नका... आपल्या जिवंत मनाची एकमेव खूण आहे ती...!!! 
     

Saturday, January 15, 2011

'' वाढ'' दिवस

        '' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! अशीच वाढत राहा.''  त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात बरंच काही सांगून जाणाऱ्या. माझ्याही नकळत हसू फुटलेलं मला ते वाचताना. जगात पाहिलं निःश्वास घेतल्यापासून क्षणाक्षणाला कणाकणाने वाढत असतो आपण. क्षण , मिनिटं, तास , दिवस , महिने , वर्ष.... काळाच्या या चढत्या परिमाणांबरोबर बदलत असतो. पण ' वाढतो' का?  
        बा. भ. बोरकरांचा संदेश आहे एक... मागे  कधीतरी वाचनात आला होता, '' जगत जा...भरत जा...'' त्या वेळेला चटकन अर्थ  कळला नाही. पण आज त्याचे पैलू उमगायला लागलेयत.  किती प्रगल्भ संदेश दिलाय. जगता जगता भरत जाण्याचा.... जाणीवेने, अभिरुचीने, विचारांनी आणि मनाच्या तरलतेनेसुद्धा...! 
       
        आपल्या  रोजच्या जगण्यात असंख्य गोष्टी घडत असतात. अनुभव, प्रसंग, भेटीगाठी, ओळखी....  यातूनच घडत जातो, समृद्ध होत जातो आपण... आपल्याला ते कधी कधी कळतही नाही. पण अचानक कधीतरी जाणीव होते , '' अरेच्चा ! कुठून शिकलो आपण हे सगळं ? ''  हे समृद्धपण असं सुखद आश्चर्याचा धक्का घेऊन  आपल्या समोर येतं, अगदी अनपेक्षितपणे...! पण त्याचं वेळी दुसऱ्या बाजूला एक रितेपण जाणवत राहत. अजून कित्ती पोकळी भारायचीये आपल्यातली कोण जाणे ? असं वाटत राहतं.  पण हीच तर खरी सुरुवात असते, जगण्याची आणि भरण्याची सुद्धा.... फक्त गरज असते ती टिपकागदी मनाने ' जे जे उत्तम ' ते ते वेचायची. नव्या, जरा आगळ्या दृष्टीने जग बघायची. मनापासून व्यक्त व्हायची. तेव्हाच आपण खरेखुरे ' जगत जातो, भरत जातो ' . बोरकरांनाही कदाचित हेच वाढणं अपेक्षित असावं. 
           ज्या दिवसापासून आपल्या अशा वाढण्याची सुरुवात होईल त्या दिवशी तो आपलं खराखुरा ' वाढ ' दिवस म्हणायला हवा आणि असा दिवस रोजच यावा. :) :) 

Friday, January 7, 2011

मिती....निर्मिती...!

असं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काहीतरी निर्मित होणार आहे याची... कधीकधी आपली अस्वस्थता घालवण्यासाठी तो स्वतःचं मन आपल्या आवडीच्या कामात गुंतवतो आणि त्यातूनच कलेचं रोपटं तरारून उठतं. 
        आपण एखादी अजोड कलाकृती पाहतो तेव्हा त्यापाठी असलेली कलावंताची प्रतिभा थक्क करणारी असते. मनात सतत प्रश्न पडत राहतो की कसं सुचलं असेल एवढं ? खांडेकरांच 'ययाती' वाचताना, एखाद्या गाण्याची अप्रतिम धून ऐकताना, एखाद चित्र पाहताना , नृत्याच्या पदान्यासावर बोटाला ठीरकावणारा तबला ऐकताना वाटतं, हे सगळं येतं कुठून ? अज्ञात उर्मीमुळे ? मग तिलाच प्रतिभा म्हणत असावेत का ? कधीकधी वाटत की हे जे जे निर्माण होतं ते अमुर्तात कुठेतरी असतं, पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त न झाल्याने आपण ते नाहीच असं म्हणतो. पण ते असतं. अव्यक्त स्वरुपात असतं असं म्हणूया हवं तर... विज्ञान म्हणतं की उर्जा ही निसर्गतःच असते, ती नष्ट करता येत नाही किंवा आपण ती निर्माण केली असाही म्हणून शकत नाही.... कारण, आपण ती एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतरित करत असतो. ती जशी निसर्गदत्त आहे, अमूर्त आहे तसाच काहीसं कलेचं ही असावं. हं , पण ती अमुर्तातली कला मूर्त स्वरुपात आणण्याचं कौशल्याचं काम कलावंत करत असतो. जसा शिल्पकार दगडातून  मूर्ती साकार करतो. असं म्हणतात की एखाद्या दगडात ती मूर्ती असतेच. पण ती साकार करण्यासाठी लागणारी दृष्टी, कसब त्या शिल्पकाराकडे असतं. म्हणूनच तर तो प्रतिभावान ठरतो. 
        आता प्रतिभावंत कलावंत सोडले तर आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी एखादी गोष्ट 'मी केली' असं थोडासा का होईना पण अहंकार असतो. पण जे सगळं घडतं ते घडवण्यासाठी आपण एक निमित्तमात्र असतो. हे एकदा कळलं ना की तिथे मीपणा कुठला आणि अहंकार कुठला? खऱ्या प्रतिभावान कलावंतांना हे बहुधा कळलेलं असावं. म्हणूनच ते इतके अलिप्त आणि निरहंकारी असतात....आपल्यालाही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

Saturday, January 1, 2011

'' आनंदाचं झाड ''



तसं म्हटलं तर , प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतो.पु लं नी तर 'मी आनंदयात्री ' असं म्हणूनच ठेवलंय. मुक्त आनंदाची उधळण म्हणजे काय याची प्रचीती त्यांच्यावरून येते. आयुष्यातला कणन कण आनंद वेचीत कसा जगावं हे शिकायचं तर पु लं कडूनच... खरं तर आपल्याही आयुष्यात असे निखळ आनंदाचे क्षण बरेचदा येतात. पण त्या ओळखण्याची दृष्टी हवी. आपल्या रोजच्या कित्येक गोष्टीत निखळ आनंदाचा झरा दडलेला असतो. तो वाहता करणं मात्र आपल्या हातात आहे...
       २०११ च्या नवीन दिवसाची सुरुवात करतानाही अशीच काहीशी भावना आहे. आजपासून छोट्या छोट्या आनंदाच्या रोपट्यांना हळूच गोंजारून त्यांना वाढतं करायचंय.  कधी विचार करून बघितलाय? या आनंदाच्या रोपट्या न्मधूनच 'आनंदाचं झाड ' जन्माला येतं  आणि  त्याची बीजंही  आपल्यातच लपलेली असतात. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, 'वेदनेतही आनंद असतो.' ऐकताना जरा विचित्र वाटेल कदाचित. पण बाळंतपनाच्या वेणानंतर जन्माला येणारं इवलं इवलं अर्भक पाहिलं की या वाक्याची सत्यता पटते. 
        थोडक्यात काय तर, एक आनंदाचा रेशमी धागा पकडून नवीन वर्षाच्या या पाउलवाटेवरून चालत राहायचं. मग वाटेत कितीही अडथळे येवोत , आपल्या हातातला आनंदाचा गर्भरेशमी वीणेचा धागा आणि मनातला आनंदाचं झाड जोपर्यंत बहरलेलं आहे तोपर्यंत ' कशाला उद्याची बात? '..... :) :) 
         हे मनातला ' आनंदाचं झाड' मनःपूर्वक जपायचं....हाच नव्या वर्षाचा संकल्प...!!!  

Related Posts Plugin for WordPress, Blogger...