
'' आमच्या डोळ्यात आत्तापर्यंत पाण्याचा एक टिपूस नाही आलेला. अजूनही येत नाही आणि कधी येणारही नाही.'' असं म्हणणारं कोणी भेटलं की खरंच आश्चर्य वाटतं. मागून राहून राहून एकच शंका मनात डोकावत राहते; ही माणसं मनातल्या मनात तरी कधी रडत असतील का? '' आपल्याकडे रडणं किंवा डोळ्यात पाणी येणं हे सहसा कमकुवत असल्याचं लक्षण मानलं जातं. (पुरुषांच्या बाबतीत तर फारच) पण '' अश्रू '' हे संवेदनांचं उत्तम लक्षण आहे. हो, अगदी वैद्यकीय परिभाषेतसुद्धा... मग ते व्यक्त करताना कमीपणा कसला ?
ते कढत पाणी गालावरून ओघळायला लागल्यावर आत कुठेतरी हळूहळू घट्ट बांधले गेलेले आपण मोकळे व्हायला लागतो. त्यांच्या तुरट-खारट चवीमागचं कारण काही कळत नाही. पण मनातलं टोचणारं काहीतरी त्याच्याबरोबर वाहून जातंय असं मात्र वाटत राहतं. लहानपणी आई कुठे दिसत नाही म्हणून घाबरून डोळ्यात येणारं पाणी, मोठं होत जाऊ तसं कधीकधी वाटणार्या असुरक्षिततेमुळे डोळ्यात तरारलेलं पाणी, कधी नकळत हळूच डोळ्याच्या काठाशी डोकावणारं पाणी यांतल्या प्रत्येकाला वेगळा अर्थ आहे. त्यांच्यात साम्य असलंच तर हे की हे सगळे सच्चे अश्रू असतात... एकदम सच्चे...! कधी आनंदाने चिंब भिजल्याने येणारे, कधी अनावर दुःखाने येणारे तर कधीकधी असंच मन कातर झाल्याने येणारे...
सो, जगातलं आपलं बाकी काहीही हरवलं तरी चालेल एक वेळ... पण ‘’ अश्रू ‘’ हरवू देऊ नका... आपल्या जिवंत मनाची एकमेव खूण आहे ती...!!!